अनेक पितृसत्ताक समाज आणि जमातींमध्ये पित्यांना पुत्रांमुळे ओळखलं जातं. परंतु मी काही मोजक्या पित्यांपैकी एक आहे, जे आपल्या कन्येमुळे ओळखले जातात. आणि मला याचा अभिमान वाटतो. (टाळ्या) मलालाने २००७ साली शिक्षणासाठी मोहीम सुरू केली आणि आपल्या हक्कांची मागणी केली. २०११ साली, या कार्याच्या सन्मानार्थ तिला राष्ट्रीय युवा शांति पुरस्कार दिला गेला. आणि ती देशातली एक प्रसिद्ध आणि कीर्तीवान तरुणी बनली. त्यापूर्वी, ती माझी कन्या होती. आता, मी तिचा पिता आहे. सभ्य स्त्रीपुरुषहो, मानवी इतिहासावर एक नजर टाकली, तर स्त्रीजातीची कहाणी म्हणजे अन्याय, भेदभाव, हिंसा आणि शोषण यांची कहाणी असल्याचं आढळतं. असं पहा, पितृसत्ताक समाजामध्ये अगदी सुरुवातीच्या कालपासूनच, मुलीचा जन्म साजरा केला जात नाही. तिचं स्वागत होत नाही. ना मातेकडून, ना पित्याकडून. शेजारपाजारचे लोक येऊन मातेजवळ सहानुभूती व्यक्त करतात. कोणीही पित्याचं अभिनंदन करीत नाही. कन्या जन्मल्यामुळे माताही अस्वस्थ असते. पहिल्या कन्येला जन्म देताच माता दुःखी होते. दुसऱ्या कन्येचा जन्म तिच्यावर आघात करतो. आणि पुत्रजन्माची आशा करताना, जेव्हा तिसऱ्या कन्येचा जन्म होतो, तेव्हा मातेला एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे अपराधी वाटतं हे मातेला तर सहन करावं लागतंच, पण त्या नवजात कन्येलाही, मोठं झाल्यावर ते सहन करावं लागतं. वयाच्या पाचव्या वर्षी, ज्यावेळी तिने शाळेत जायला हवं, त्यावेळी ती घरीच राहते आणि तिच्या भावांना शाळेत घातलं जातं. वयाला बारा वर्षं होईपर्यंत तिचं आयुष्य तसं सुखाचं जातं. तिला मौज करता येते. ती भर रस्त्यात तिच्या मैत्रिणींशी खेळू शकते. रस्त्यांवरून चालू फिरू शकते. जणु एखादं फुलपाखरुच. पण तिने पौगंडावस्थेत प्रवेश करताच, ती १३ वर्षांची होताच , तिला एखाद्या पुरुषाच्या सोबतीशिवाय घराबाहेर पडायला बंदी केली जाते. घराच्या चार भिंतींमध्ये ती बंदिस्त होते. यानंतर एक स्वतंत्र व्यक्ती म्हणून तिचं अस्तित्व संपतं. आता ती फक्त तथाकथित अब्रू म्हणून जगते. तिच्या पित्याची आणि भावांची. आणि तिच्या घराण्याची. आणि तिने जर मर्यादा ओलांडून त्या तथाकथित अब्रूचे नियम मोडले, तर ती आपला जीवही गमावू शकते. आणि यातली लक्षवेधक बाब अशी, की या तथाकथित अब्रूचा परिणाम केवळ मुलीवरच नव्हे, तर घरातल्या पुरुषांवरही होतो. सात बहिणी आणि एक भाऊ असलेल्या एका कुटुंबातला तो भाऊ देशांतर करून आखाती देशांत गेला आहे. आपल्या सात बहिणी आणि मातापित्यांचा चरितार्थ चालवण्यासाठी. कारण, आपल्या सात बहिणींनी काही विद्या शिकून घराबाहेर पडून कमाई करणं हे त्याला अपमानास्पद वाटतं. म्हणून त्या भावाने तथाकथित अब्रूच्या वेदीवर आपल्या सुखांचा आणि बहिणींच्या आनंदाचा बळी दिला आहे. पितृसत्ताक समाजांत आणखी एक गोष्ट प्रमाण मानली जाते, ती म्हणजे आज्ञाधारकता. गुणी मुलगी अगदी शांत, अतिशय नम्र आणि अत्यंत मवाळ असावी, असे निकष असतात. आदर्श गुणी मुलगी ही खूप शांत असते. तिने गप्प बसायचं असतं. आणि आपल्या मात्यापित्यांचे निर्णय स्वीकारायचे असतात. आणि वयस्कर लोकांचे निर्णयही, तिला ते आवडले नाहीत तरीही. तिला न आवडणाऱ्या पुरुषाशी किंवा एखाद्या म्हाताऱ्याशी तिचं लग्न लावलं गेलं, तरी तिला ते मान्य करावं लागतं. कारण तिला, अवज्ञा करणारी, असं बिरूद नको असतं. तिचं लग्न बालवयात लावलं गेलं, तरी तिला ते मान्य करावं लागतं. नाहीतर तिला अवज्ञा करणारी म्हणतात. आणि शेवटी काय घडतं? एका कवयित्रीच्या शब्दांत, तिचं लग्न होतं, मग संभोग, आणि मग ती आणखी मुलांना आणि मुलींना जन्म देते. आणि परिस्थितीतलं व्यंग पहा, हीच माता आपल्या मुलींना तोच आज्ञापालनाचा धडा देते. आणि आपल्या मुलांना तोच अब्रूरक्षणाचा धडा देते. हे दुष्ट चक्र असंच चालत राहतं. सभ्य स्त्रीपुरुषहो, लक्षावधी स्त्रियांची दुर्दशा आपल्याला थांबवता येईल. आपली विचारसरणी बदलली तर. स्त्रियांची आणि पुरुषांची विचारसरणी बदलली तर. विकसनशील देशांमधल्या पितृसत्ताक समाज आणि जमातींतल्या स्त्रीपुरुषांनी जर काही कौटुंबिक आणि सामजिक मानदंड मोडले, तर. आपापल्या राज्यव्यवस्थेतले स्त्रियांच्या मूलभूत हक्कांवर गदा आणणारे पक्षपाती कायदे जर ते रद्द करू शकले, तर. प्रिय बंधूभगिनींनो, मलाला जन्मली तेव्हा प्रथमच, विश्वास ठेवा, खरं तर मला नवजात अर्भकं आवडत नाहीत. पण जेव्हा मी जाऊन तिच्या डोळ्यांत पाहिलं, तेव्हा, विश्वास ठेवा, मला खूप सन्मानित झाल्यासारखं वाटलं. तिच्या जन्माच्या पुष्कळ आधी मी तिच्या नावाचा विचार केला होता. आणि अफ़गाणिस्थानातल्या एका प्रसिद्ध शूर स्वातंत्र्यसैनिकेमुळे मी भारावलो होतो. तिचं नाव होतं मैवंद ची मलालाई. तिच्यावरून मी माझ्या मुलीचं नाव ठेवलं. मलालाच्या, माझ्या मुलीच्या, जन्मानंतर काही दिवसांनी, माझा एक भाऊ मला भेटायला आला. हा एक योगायोगच म्हणायला हवा. तो माझ्या घरी आला, एक वंशावळी घेऊन. युसफ़झई घराण्याची वंशावळी. आणि मी त्या वंशावळीकडे पाहिलं, तर ती ३०० वर्षं मागे जाऊन आमच्या पूर्वजांचा मागोवा घेत होती. पण मी पाहिलं, की ते सगळे पूर्वज पुरुष होते. मी माझी लेखणी उचलली, माझ्या नावापुढे एक ओळ काढली, आणि लिहिलं, "मलाला". जेव्हा ती मोठी झाली, साडेचार वर्षांची झाली, तेव्हा मी तिला माझ्या शाळेत प्रवेश दिला. तुम्ही विचाराल, की मी एका मुलीच्या शाळाप्रवेशाचा उल्लेख का करतो आहे? हो, मला त्याचा उल्लेख केलाच पाहिजे. कॅनडात ते गृहित धरलं जात असेल, अमेरिकेत आणि अनेक विकसित देशांतही. पण गरीब देशांत, पितृसत्ताक समाज आणि जमातींमध्ये मुलीच्या आयुष्यातली ही मोठी घटना आहे. शाळाप्रवेश म्हणजे, तिच्या नावाची आणि व्यक्तित्वाची ओळख. शाळाप्रवेश म्हणजे, स्वप्नांच्या आणि आशांच्या दुनियेत तिचा प्रवेश, जिथे ती भावी आयुष्यासाठी आपल्या सामर्थ्याचा शोध घेऊ शकेल. मला पाच बहिणी आहेत. त्यातल्या कुणालाच शाळेत जाता आलं नाही. तुम्हाला आश्चर्य वाटेल, दोन आठवड्यांपूर्वी मी जेव्हा कॅनेडियन व्हिसाचा फॉर्म भरत होतो, तेव्हा कौटुंबिक माहितीचा भाग भरताना, माझ्या काही बहिणींची आडनावंच मला आठवेनात. आणि याचं कारण म्हणजे, मी माझ्या बहिणींची नावं कधीच कोणत्याही कागदपत्रांवर लिहिलेली पाहिली नाहीत. याच कारणाने मी माझ्या मुलीला प्रतिष्ठेने वागवलं. माझे वडील माझ्या बहिणींना, म्हणजे त्यांच्या मुलींना, जे देऊ शकले नाहीत, ते मी बदललंच पाहिजे, असं मला वाटत होतं. मी माझ्या मुलीच्या बुद्धिमत्तेची आणि प्रतिभेची कदर केली. माझे मित्र येत त्यावेळी मी तिला आमच्याबरोबर बसण्यास प्रोत्साहन देत असे. माझ्याबरोबर वेगवेगळ्या सभांना जाण्यास उत्तेजन देत असे. तिच्या व्यक्तिमत्वात हे चांगले गुण भिनवण्याचा मी प्रयत्न केला. आणि फक्त मलालाच्या बाबतीतच नव्हे. माझ्या शाळेतल्या विद्यार्थिनी आणि विद्यार्थ्यांना मी हे गुण शिकवले. शिक्षणाचा वापर मी उद्धारासाठी केला. माझ्या मुलींना, माझ्या विद्यार्थिनींना, मी आज्ञापालनाचा धडा विसरायला शिकवलं. माझ्या विद्यार्थ्यांना मी तथाकथित दांभिक अब्रूचा धडा विसरायला शिकवलं. प्रिय बंधुभगिनींनो, आम्ही स्त्रियांना जास्त हक्क मिळावेत म्हणून झगडत होतो. आणि स्त्रियांना समाजात जास्तीत जास्त स्थान मिळावं म्हणून झगडत होतो. पण आम्हाला एक नवीनच प्रकार आढळून आला. तो मानवी हक्कांसाठी प्राणघातक होता. खासकरून, स्त्रियांच्या हक्कांसाठी. त्याचं नाव तालिबानीकरण. म्हणजे स्त्रियांना सर्व राजकीय, आर्थिक आणि सामाजिक घडामोडींमध्ये भाग घेण्यापासून बंदी. शेकडो शाळा नष्ट झाल्या. मुलींना शाळेत जायला बंदी केली गेली. स्त्रियांना बुरखा वापरण्याची सक्ती झाली. त्यांचं बाजारहाट करणं बंद झालं. संगीतकारांचं संगीत बंद करण्यात आलं. मुलींना फटके देण्यात आले आणि गायकांना ठार मारण्यात आलं. लक्षावधी लोक हे सहन करीत होते. पण फार थोड्या लोकांनी याविरुद्ध आवाज उठवला. जेव्हा सभोवती फटके देणारे आणि ठार मारणारे लोक असतात, तेव्हा त्याविरुद्ध आवाज उठवणं ही खरोखर सर्वात भयंकर गोष्ट असते. वयाच्या दहाव्या वर्षी, मलाला शिक्षणाच्या हक्कासाठी उभी राहिली. बी बी सी च्या ब्लॉगसाठी तिने रोजनिशी लिहिली. न्यूयॉर्क टाईम्सच्या माहितीपटांसाठी तिने स्वेच्छेने काम केलं. आणि शक्य तितक्या व्यासपीठांवरून ती बोलली. तिच्या आवाजात खूप ताकद होती. तो उत्तरोत्तर बुलंद होत जात जगभर पोहोचला. आणि यामुळेच तालिबानला तिची मोहीम सहन झाली नाही. ९ ऑक्टोबर २०१२ रोजी तिच्या मस्तकात सरळ समोरून गोळी झाडण्यात आली. आमच्या कुटुंबासाठी तो प्रलयाचाच दिवस होता. आमचं जग म्हणजे एक मोठं कृष्णविवर बनलं. जेव्हा माझी कन्या जीवनमरणाच्या सीमेवर होती, तेव्हा मी माझ्या पत्नीला हलकेच विचारलं, आपल्या मुलीला जे सहन करावं लागलं, त्यासाठी मी दोषी आहे ना? आणि ती लगेच म्हणाली, कृपा करून स्वतःला दोष देऊ नका. तुम्ही योग्य कारणासाठी उभे राहिलात. तुम्ही तुमचं आयुष्य पणाला लावलंत. सत्यासाठी, शांततेसाठी, शिक्षणासाठी. तुमची कन्या तुमच्यापासून प्रेरणा घेऊन तुम्हाला साथ देते आहे. तुमचा दोघांचा मार्ग योग्यच होता. देव तिचं रक्षण करील. हे शब्द माझ्यासाठी फार मोलाचे होते. तो प्रश्न मी पुन्हा विचारला नाही. जेंव्हा मलाला हॉस्पिटलमध्ये होती, आत्यंतिक वेदना सहन करीत होती. चेहऱ्याची नस कापली गेल्यामुळे तिचं डोकं प्रचंड दुखत होतं. त्यावेळी मला माझ्या पत्नीच्या चेहऱ्यावर एक गडद छाया पसरलेली दिसायची. पण माझ्या मुलीने कधीच तक्रार केली नाही. ती आम्हाला सांगायची, मी मजेत आहे. जरी वेडीवाकडी हसत असले आणि माझा चेहरा बधीर झाला असला तरीही. मी बरी होईन. काळजी करू नका. तीच जणु आमचा आधार होती. तिने आमचं सांत्वन केलं. प्रिय बंधुभगिनींनो, अत्यंत कठीण परीस्थितीतून लवचिकपणे बाहेर कसं यायचं ते आम्ही तिच्याकडून शिकलो. तुम्हाला सांगताना आनंद वाटतो, की स्त्रियांच्या आणि मुलांच्या हक्कांचं प्रतीक म्हणून वावरत असतानाही ती कोणत्याही १६ वर्षांच्या मुलीसारखीच वागते. गृहपाठ अपूर्ण राहिला तर रडते. आपल्या भावांशी भांडते. याचा मला फार आनंद वाटतो. लोक मला विचारतात, मी असं कोणतं खास मार्गदर्शन केलं, की ज्यामुळे मलाला इतकी धीट आणि निर्भय बनली? आत्मविश्वासाने इतकं बोलू शकली? मी त्यांना सांगतो, मी काय केलं हे मला विचारू नका. मी काय केलं नाही ते विचारा. मी फक्त तिचे पंख छाटले नाहीत, इतकंच. मी आपला फार आभारी आहे. (टाळ्या) धन्यवाद. मी आपला फार आभारी आहे. धन्यवाद. (टाळ्या).