आम्हां भारतीयांची कुटुंबे मोठी असतात. मी पैजेवर सांगते, आपल्यापैकी अनेकांनी हे ऐकलं असेल. कौटुंबिक समारंभ अनेक असतात. लहानपणी, माझे पालक मला अशा कौटुंबिक कार्यक्रमास नेत. पण मी नेहमीच वाट बघत असे, ती माझ्या चुलत भावंडांबरोबर खेळण्याची. आणि हे एक काका नेहमी तिथे असत. आमच्याबरोबर उडया मारायला नेहमी तयार. आमच्यासाठी खेळ आणत. आम्हा मुलांना बालपणाचा आनंद लुटू देत. ते अतिशय यशस्वी होते. त्यांच्यापाशी बळ आणि आत्मविश्वास होता. पण नंतर मी या तंदुरुस्त माणसाची तब्येत ढासळताना पाहिली. त्यांना पार्किन्सन्सचं निदान झालं होतं. पार्किन्सन्स हा आजार चेतासंस्थेमध्ये बिघाड करतो. म्हणजे आतापर्यंत स्वावलंबी असणाऱ्या माणसाला अचानक कापऱ्यामुळे, कॉफी पिण्यासारखं काम फार कठीण वाटू लागतं. काकांनी चालण्यासाठी वॉकर वापरायला सुरुवात केली. आणि वळण्यासाठी, त्यांना अक्षरशः एका वेळी एक पाऊल टाकावं लागे. असं. खूप वेळ लागायचा. तर हे काका, जे प्रत्येक समारंभाचे उत्सवमूर्ती असत, ते अचानक लोकांच्या पाठी दडू लागले. लोकांच्या कीव करणाऱ्या नजरांपासून ते लपत होते. आणि असे जगात ते काही एकटेच नाहीत. दरवर्षी ६०,००० लोकांना पार्किन्सन्सचं निदान केलं जातं. आणि ही संख्या वाढतच आहे. आपल्या रचनांनी बहुआयामी समस्या सोडवाव्यात हे आम्हा रचनाकारांचं स्वप्न असतं. सर्व समस्या सोडवणारं एक उत्तर. पण नेहमी हे असंच असायला हवं, असं काही नाही. छोट्या समस्यांवर लक्ष केंद्रित करून, त्यांच्यावर छोटी उत्तरं शोधून, अखेरीस मोठा परिणाम साधता येतो. तर इथे, पार्किन्सन्स बरा करणे हा माझा हेतू नव्हता. तर, त्यांची रोजची कामं जास्त सोपी करणं आणि त्यातून मोठा परिणाम साधणं. प्रथम मी कंपावर लक्ष केंद्रित केलं. बरोबर? काकांनी मला सांगितलं होतं, की त्यांनी लोकांसमोर चहा वा कॉफी पिणं बंद केलं आहे. केवळ लज्जेमुळे. म्हणून मी न सांडणाऱ्या कपाची रचना केली. केवळ त्याच्या आकारामुळेच तो कार्य करतो. प्रत्येक कंपनावेळी, वरच्या वक्राकारामुळे कपातला द्रवपदार्थ आतच वळवला जातो. आणि नेहमीच्या कपाच्या तुलनेत, या कपातलं पेय कपातच राहतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या कपाला पार्किन्सन्स कप असं नाव दिलेलं नाही. तुम्ही, मी किंवा कोणीही वेंधळा माणूस वापरू शकेल असा हा कप दिसतो. त्यामुळे तो वापरणं आणि इतर लोकांत मिसळून जाणं हे सोपं होतं. तर, एक समस्या सुटली. आणखी बऱ्याच आहेत. हा सगळा वेळ, मी त्यांची मुलाखत घेत होते. त्यांना प्रश्न विचारत होते. तेव्हा माझ्या लक्षात आलं की मला फक्त वरवरची माहिती मिळत होती. फक्त माझ्या प्रश्नांची उत्तरं. एक नवा दृष्टीकोन मिळण्यासाठी मला जास्त खोलवर खोदावं लागणार होतं. म्हणून मी ठरवलं, आपण त्यांच्या रोजच्या कामांचं निरीक्षण करू ते खात असताना, टी. व्ही. पाहत असताना. आणि जेव्हा मी त्यांना चालत जेवणाच्या टेबलाजवळ जाताना पाहिलं, तेव्हा माझ्या मनात आलं, सपाट जमिनीवर चालणं कठीण वाटणारा हा माणूस जिने कसे चढत असेल? कारण भारतात आमच्याजवळ जिन्यावरून वर चढवणारा शानदार रूळ नाही. विकसित देशांसारखा. जिने स्वतःलाच चढावे लागतात. तर ते मला म्हणाले, " चल, मी जिने कसे चढतो ते तुला दाखवतो." मी जे पाहिलं ते आता आपण पाहू. इथपर्यंत पोहोचायला त्यांना बराच वेळ लागला. आणि हा सगळा वेळ मी विचार करत होते, अरे देवा! ते खरंच हे करणार आहेत का? खरंच, ते वॉकरशिवाय हे करू शकतील का? आणि मग.. (हशा) आणि वळणं.. ती त्यांनी किती सहज घेतली. धक्का बसला ना? मलाही बसला होता. सपाट जमिनीवर चालू न शकणारा हा माणूस, जिने चढण्यामध्ये एकदम सराईत होता. संशोधन केल्यावर याचं कारण समजलं, की ही एक सलग हालचाल होती. आणखी एक माणूस आहे, त्यालाही हीच लक्षणं सतावतात. तो देखील वॉकर वापरतो. पण सायकलवर बसवताक्षणीच त्याची सगळी लक्षणं नाहीशी होतात. कारण ती एक सलग हालचाल आहे. तर माझ्यासाठी महत्त्वाचं होतं ते, जिन्यावर चढण्याची ती भावना, जमिनीवर चालताना जाणवून देणं. त्यांच्यावर अनेक कल्पनांची चाचणी घेतली गेली. पण अखेरीस या एका कल्पनेला यश आलं. (हशा) (टाळ्या) ते जलद चालताहेत, हो ना ? (टाळ्या) मी याला जिन्याचा आभास म्हणते. आणि जेव्हा हा आभास संपला, तेव्हा ते एकदम जागीच गोठले. आणि याला म्हणतात, गतीचे गोठणे. आणि हे बरेचदा होतं. तर मग, असा जिन्याचा आभास त्यांच्या सगळ्या खोल्यांतून वाहता का असू नये? त्यामुळे त्यांचा आत्मविश्वास खूपच वाढेल. तंत्रज्ञान हेच काही सर्व प्रश्नांचं उत्तर नव्हे. आपल्याला हवीत माणसाला केंद्रस्थानी ठेवून शोधलेली उत्तरं. मी नक्कीच याचं प्रक्षेपण करू शकले असते. किंवा गूगल चष्मा, किंवा तसंच काहीतरी. पण मी जमिनीवर साधी छपाई करण्याचाच आग्रह धरला. ही छपाई इस्पितळांत नेता येईल. त्यामुळे त्यांना तिथे आपलं स्वागत झाल्यासारखं वाटेल माझी इच्छा आहे, की पार्किन्सन्सच्या प्रत्येक रुग्णाला तसंच वाटावं, जसं माझ्या काकांना त्या दिवशी वाटलं होतं. ते मला म्हणाले, की त्यांना पुन्हा आपल्या भूतकाळात गेल्यासारखं वाटलं. आजच्या युगात "स्मार्ट" चा अर्थ "उच्च तंत्रज्ञान" असा झाला आहे. आणि जग दिवसेंदिवस जास्त "स्मार्ट" होत चाललं आहे. पण "स्मार्ट" म्हणजे सोपं असूनही परिणामकारक असं काही का असू नये? यासाठी हवी केवळ थोडी सहसंवेदना आणि थोडं कुतूहल, प्रत्यक्ष जाऊन निरीक्षण करण्यासाठी. पण आपण इथेच थांबूया नको. आपण जास्त गुंतागुंतीच्या समस्या शोधू. त्यांची भीती न बाळगता. त्यांची तोडफोड करून, त्यांच्यामधून छोट्या छोट्या समस्या वेगळ्या करू. आणि मग त्यांच्यासाठी सोपी उत्तरं शोधू. उत्तरं तपासून पाहू. अपयश आलं तर तेही स्वीकारू. पण ते सुधारण्याचा नवा बोध घेऊन. आपण सगळ्यांनी सोपी उत्तरं शोधली, तर आपण काय काय करू शकू, कल्पना करा. आपल्या सगळ्यांची सोपी उत्तरं एकत्र करून होणारं जग कसं असेल? एक जास्त "स्मार्ट" जग निर्माण करू या. पण साधं सोपं. धन्यवाद. (टाळ्या)